Thursday, April 14, 2011

काहीतरी नविन ! - १४ एप्रिल

The greatest battles of life are fought out daily in the silent chambers of the soul.
- David O. McKay



मागचा सगळा आठवडा ‘अण्णा हजारे’ या साडेपाच अक्षरांनी व्यापुन टाकला होता.

खूप वर्षांनी आपल्या देशात एक अनोखी घटना घडली. एका अ-राजकीय छत्रीखाली या देशातील आबाल-वृध्द मंडळी एका गोष्टीविरुद्ध लढा देण्यासाठी एकत्र जमली. बेदाग़ चारित्र्य असलेल्या अण्णांच्या एका हाकेला 'ओ' देत लाखो माणसं या लढाईत सामील झाली. इंटरनेट (फेसबुक आणि तत्सम), इमेल, एसेमेस अशा अत्याधुनिक माध्यमांनी या आंदोलनात महत्वाचे योगदान दिले. असं म्हणत असतानाच मी हे देखील सांगू इच्छितो की या माध्यमांनी आपल्या अंगभूत मर्यादांचेही प्रदर्शन केले. इंग्रजीमध्ये ज्याला candy floss feeling म्हणतात ते देण्यात ही अत्याधुनिक माध्यमे यशस्वी ठरली. घरबसल्या किंवा ऑफिसबसल्या एक मिस्ड कॉल करून, एक एसेमेस पाठवून, एक इमेल फोरवर्ड करून किंवा एक ऑनलाईन पिटीशन भरून आपण आपली ‘कर्म’ करायला मोकळे झालो यात जी एक 'सोय' होती तीच या माध्यमांची सर्वात मोठी मर्यादा आहे. भ्रष्टाचारासारखा एक जटील आणि सर्वव्यापी प्रश्न आपण आपल्या 'मोकळ्या वेळात' निकालात काढला. माझा या माध्यमांवर आक्षेप नाही. पण या माध्यमांद्वारा आपण एखाद्या समस्येचं जे (सोयीस्कर) 'सोपेकरण' करतो ते मला फार मजेशीर वाटतं.

वृत्तपत्रे, टीव्ही ही माध्यमे देखील स्वतःला आवरू शकली नाहीत. सतत लपून-छपून अण्णांची टिंगल करणाऱ्या माध्यमांनी अण्णांना एका रात्रीत ‘देशनायक’ करून 'दुसरे गांधी' वगैरे किताब देऊन टाकले ! तथाकथीत सेलिब्रिटी मंडळींनी अण्णा हजारे यांना पाठिंबा देताच जणू अख्खा देशच अण्णांच्या पाठीशी उभा राहिला आहे असं काहीसं चित्र प्रसार माध्यमांनी उभं केलं. (नाही म्हणायला देश पाठीशी होता, पण तो 'अण्णा आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है' या टाइपचा होता. अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारण्याचाच हा प्रकार होता.) ‘पेज-थ्री’ मंडळीनी डोक्यावर 'मै अण्णा हजारे हुं' असं लिहिलेल्या गांधीटोप्या घालून आणि हातात 'मेरा नेता चोर है' असं लिहिलेली पोस्टर्स घेऊन मोर्चे काढले. आपल्या देशात एखाद्या गोष्टीत 'Form over Substance' किती पराकोटीचा असू शकतो याचं हे (आणखी एक) उदाहरण होतं. अण्णा हजारे भ्रष्टाचाराविरुद्ध गेली अनेक वर्षे एकाकी लढा देत आहेत. पण त्यांना यावेळी मिळाला तसा ‘अभूतपूर्व प्रतिसाद’ पूर्वी कधी मिळाल्याचं ऐकिवात नाही. जंतर मंतर येथे उभ्या राहिलेल्या या आंदोलनावर निर्विवादपणे नुकत्याच झालेल्या इजिप्त मधील क्रांतीची छाया होती. लोकपाल बिलाच्या जडणघडणीत संयुक्त समितीची स्थापना होताच जणू हा देश भ्रष्टाचारमुक्त झाला आहे अशा अर्थाचे मथळे वृत्तपत्र आणि टीव्हीवाल्यांनी दिले. वर्ल्ड-कप जिंकल्याप्रमाणे एक 'विजयी' वातावरण निर्माण करण्यात माध्यमे यशस्वी ठरली. माझ्या दृष्टीने तोच सर्वात मोठा धोका आहे. कारण या सर्व माध्यमांना हे पक्कं ठाऊक आहे की जोवर या पृथ्वीवर ‘माणूस’ नावाचा प्राणी आहे तोवर 'भ्रष्टाचार' ही गोष्ट समूळ नष्ट होणं केवळ अशक्य आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन या इतकीच भ्रष्टाचार ही माणसाची आदिम प्रेरणा आहे. माझ्या या विधानावर तीच माणसे हसतील ज्या माणसांनी भ्रष्टाचाराची व्याख्या सोयीस्कररित्या 'भ्रष्टाचार म्हणजे पैशांचा गैरव्यवहार' अशी केली आहे. अगदी जेमतेम मराठी कळणारा कुठलाही माणूस सांगू शकेल की भ्रष्टाचार म्हणजे 'भ्रष्ट-आचार'. मग तो राजकीय असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल किंवा अगदी वैयक्तिक पातळीवर असेल. मग प्रश्न उरतो की एखादा आचार हा भ्रष्ट आहे की नाही हे ठरवायचं कोणी आणि कसं ?
... सांगतो.

प्रत्येक माणसाचा एक 'आतला आवाज' असतो. इंग्रजीत त्याला 'conscience' असं म्हणतात. आपल्या ‘मनाच्या’ आत जे आवाज उमटत असतात त्याला Self-Talk म्हणतात. त्याच्या पलीकडे, खूप खोल, हा 'आतला आवाज' असतो. नीट विचार केलात तर तुमच्या असं लक्षात येईल की जसजसे आपण मोठे होत गेलो, शाळा कॉलेजात जाऊन शिकत गेलो तसतसा हा ‘आतला आवाज’ खूप क्षीण होत गेला आणि आपल्या मनाचा आवाज मोठा होत गेला. तुम्ही जर आतल्या आवाजाचा कौल घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की तो नेहमीच objective असतो. या उलट आपलं मन नेहमी rationalize ('rational -lies' ! ) करत असतं. गोड खायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यावर (किंवा तुम्ही स्वतः तसं ठरवल्यावर) जेव्हा पार्टीत गुलाबजाम दिसतात तेव्हा काय होतं ते आठवून पहा. ‘गुलाबजाम खाऊ नकोस !’ असं आपला 'आतला आवाज' ओरडून ओरडून सांगत असतो. मग हळूहळू आपण मनाच्या आवाजाचा volume वाढवू लागतो. गुलाबजाम मला किती आवडतात, एक गुलाबजाम खाऊन काय फरक पडतो, उद्या कोणी पाहिलाय ? वगैरे गोष्टींचं स्वतःलाच rationalization देऊन आपण एकदाचा तो गुलाबजाम खातो. हाच भ्रष्टाचार ! एका वाक्यात सांगायचं म्हणजे आपल्या ‘आतल्या आवाजाशी’ आपण केलेली प्रतारणा म्हणजे भ्रष्टाचार ! It needs tremendous courage and solid character to listen to your inner voice and follow it.

एकदा का भ्रष्टाचाराची व्याख्या इतकी रुंद झाली की मग आपल्या लक्षात येतं की 'राजकारणी मंडळी भ्रष्टाचारी आहेत' असं म्हणण्याचा अधिकारच आपण गमावून बसतो. 'मेरा नेता चोर है' असं लिहिलेली पोस्टर्स हातात घेऊन मोर्चे काढणं मग हास्यास्पद होऊन बसतं. आपल्या भोवताली जी काही परिस्थिती आहे ते आपलंच प्रतिबिंब आहे. आपण सगळेच थोडे थोडे 'भ्रष्ट' आहोत म्हणून आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, ही यंत्रणा भ्रष्ट आहे. समजा, तुमच्या नाकाला डाग लागला. आरशात बघताना तुमचं नाक पुसाल, की आरशात दिसणारं नाक पुसाल ? आरशाची analogy जर इथे लावायची झाली तर आपलं प्रतिबिंब - म्हणजे आपले लोकप्रतिनिधी - सुधारायचे की स्वतःला सुधारायचं हे आपणच ठरवायचं आहे. अर्थात आपल्या लोकप्रतिनिधींना सुधारण्यापेक्षा स्वतःला सुधारणं खूप सोपं आहे, ही गोष्टच खूप आशादायी आहे ! 'आपण पांढरे स्वच्छ आणि सरकार भ्रष्टाचारी' असा आपला जो एकंदरीत आव असतो त्यात आपण 'सरकार' या यंत्रणेपासून तुटल्याची ती खूप मोठी खुण असते, जे धोकादायक असतं. खरं तर लोकशाहीत 'सरकार' म्हणजे आपणच असतो. परंतु आपल्या आयुष्याची जबाबदारी दुसऱ्यावर लादण्यासाठी आपल्याला 'परमेश्वराप्रमाणे' सरकारची गरज भासते. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा द्यायचा असेल तर तो प्रत्येक माणसाला आधी स्वतःशी आणि मग इतरांशी द्यावा लागेल. सिग्नल तोडायचा नाही असं एकदा ठरवलं की मग मोकळ्या रस्त्यावर आणि पोलीस नसताना सिग्नल न तोडणं ही आपली आपल्याशीच लढाई होऊ शकेल. मागची माणसं जोर जोरात हॉर्न वाजवतील. हा कसोटीचा क्षण असेल. कारण या अन्यायाविरुध्द आवाज उठवायला तिथे अण्णा हजारे नसतील, तुम्हाला पाठिंबा द्यायला तिथे आमीर खान नसेल. तुमचे फोटो घ्यायला कोणी रिपोर्टर नसेल. तुम्ही सिग्नल तोडला नाहीत याची बातमी उद्या पेपरमध्ये येणार नसेल. At the end of the day, कायद्याची अंमलबजावणी करून तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक राहिलात याचं जे समाधान असेल ते महत्वाचं असेल ! (‘किती समाधानी वाटलं’ हे विचारायला तिथे पत्रकार नसतील हेही लक्षात असू दे ! ) या देशातल्या प्रत्येक माणसाने लढलेला भ्रष्टाचाराविरुद्धचा हा एकाकी लढाच सर्वात परिणामकारक असेल. हे सगळं एका रात्रीत होईल इतका भाबडा आशावाद माझ्याकडे नक्कीच नाही. पण एक नक्की की, उद्याच्या पिढीसाठी हा अख्खा देश नव्याने बांधावा लागणार आहे. आपले हे कर्तव्य आणि स्वप्न असू दे की ती पिढी जेव्हा मोठी होईल तेव्हा त्यांना सिग्नल न तोडणे, रस्त्यावर न थुंकणे, लाच न देणे, रांगेचा आदर करणे, वेळ पाळणे या गोष्टी ‘चांगल्या सवयी’ वाटणार नाहीत तर श्वास घ्यावा इतक्या सहज आणि नैसर्गिक वाटतील.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी माझ्या मित्रांबरोबर अण्णा हजारेंच्या गावाला (राळेगणसिद्धी) गेलो होतो. अण्णांच्या प्रेरणेने त्या गावाचा झालेला कायापालट पहात होतो. समोरून अण्णा चालत येताना दिसले. आम्ही शिस्तीत उभे राहिलो. त्या दिवशी खरं तर अण्णांचं मौनव्रत होतं. पण अण्णांपुढे आमचीच बोलती बंद झाली होती. त्यांच्या कर्तुत्वाचा म्हणा वा साधेपणाचा म्हणा, एक aura आम्ही अनुभवत होतो. आमच्या खिशात पैसे होते, क्रेडीट कार्ड्स होती. पण स्वतःच्या नावावर एकही मालमत्ता नसलेल्या अण्णांसमोर आम्हाला त्या दिवशी प्रचंड ‘गरीब’ असल्यासारखं वाटलं होतं ! मला त्यादिवशी खूप वाटलं होतं की अण्णांनी आपलं मौन काही वेळासाठी मोडावं आणि आमच्याशी दोन शब्द बोलावं. पण अण्णांनी आपला निश्चय मोडला नाही. काही क्षण तिथे थांबून, हाताच्या खुणांनी आमची विचारपूस करून ते तिथून निघून गेले. एकही शब्द न बोलता आम्ही दोघांनी काही क्षण का होईना, एकमेकांशी 'संवाद' साधला होता. मी तो दिवस विसरू शकत नाही.
गंमत अशी आहे की, इतक्या वर्षांनंतर, नियतीने नेमका तोच प्रसंग आज काळाच्या पडद्यावर पुन्हा एकदा उभा केला आहे.
अण्णा तसेच समोरून चालत येत आहेत. फक्त आज आम्हा मित्रांच्या जागी अण्णांचे विरोधक आणि अजस्त्र मिडिया उभी आहे.
ही सर्व मंडळी टपून बसली आहेत की अण्णांनी मौन न धरता खूप खूप बोलावं. पण माझी इच्छा आहे की, 'त्या' दिवसासारखंच अण्णांनी आपलं 'मौन' कायम ठेवावं आणि मंडळींना उपचारापुरता एक नमस्कार करून आपल्या कामाला निघून जावं.

आदरणीय अण्णा,
एका नव्या भारताचं 'भूमिपूजन' नुकतं कुठे पार पडलंय. पण सेलिब्रेशनची ‘ही’ वेळ नाही.
अजून बरीच कामं उरकायची आहेत.
तुम्हालाही... आणि आम्हालाही !

3 comments:

  1. Good work! Really written very well.

    ReplyDelete
  2. I think there is really something was missing in Anna's Struggle against corruption. That's why it has not taken rise as per expections. But we can hope for future amy be this struggle against corruption will take momentum in future.

    ReplyDelete
  3. this is real image of our Indians including ME. This is eye opening write up thanks a lot JAI HIND......

    ReplyDelete