Don't simply retire from something; have something to retire to.
- Harry Emerson Fosdick
कारखानीस बाई ऑफिसमधील आपल्या टेबलाशी आल्या आणि खुर्चीत बसल्या. सवयीप्रमाणे त्यांनी आपली पर्स टेबलाच्या उजव्या बाजूला ठेवली. सवयीप्रमाणे त्यांनी पाण्याने भरून ठेवलेला ग्लास उचलला आणि कोरडा झालेला आपला घसा ओला केला. सवयीप्रमाणे त्यांनी टेबलावर ठेवलेल्या गणपतीच्या फ्रेमला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि क्षणभरासाठी डोळे बंद केले. सवयीप्रमाणे त्यांनी डोळे उघडले. सवयीप्रमाणे त्यांनी टेबलाच्या वरच्या खणात ठेवलेली 'आजची कामं' लिहायची डायरी बाहेर काढली. सवयीप्रमाणे त्यांनी आजची तारीख उघडली - '३१ मार्च'. त्यांचा हात तिथेच थबकला आणि किंचित थरथरलाही. त्याच थरथरत्या हातांनी डायरीच्या 'आजच्या पानावर' त्यांनी मोठ्या अक्षरात लिहिलं – Farewell to Mrs. Urmila Karkhanis at 4 pm !
ऑफिसमधली मिटिंग रूम पावणेचार वाजल्यापासूनच भरून गेली होती. माणसं घोळके घोळके करून उभी होती. त्यात कारखानीस बाईंबरोबर काम केलेली माणसं फारच थोडी. तरुण पोरं पोरी चिक्कार. फेअरवेलच्या निमित्ताने लोकांना अधिकृत ब्रेक मिळाला होता. त्यामुळे सगळेच जरा सैल झाले होते. चहाच्या कपात बिस्किटे बुडवत गप्पांना उधाण आले होते. कालची भारत-पाकिस्तान मॅच, नेल पॉलिशच्या शेड्स,मनमोहन सिंग, फेसबुक, बॉसला शिव्या, मुलांचे शाळेतले प्रोजेक्ट्स, लिंकिंग रोड वरच्या स्वस्त चपला, क्रीम बिस्किटे पोटाला वाईट वगैरे चौफेर गप्पा चालू होत्या.
अचानक चोर आवाजात कोणीतरी म्हणालं, 'मॅडम आल्या, मॅडम आल्या...' सर्वांनी दरवाज्याकडे पाहिलं.
एकच शांतता पसरली आणि त्याच शांततेला छेदत टाळ्यांचा कडकडाट झाला.
कारखानीस बाईंचे बॉस साठे कारखानीस बाईंना घेऊन आत आले होते. त्यांनी बाईंना खुर्चीवर बसायची विनंती केली.
मग आधी साठयांनी बसायचं की कारखानीस बाईंनी यात दहा बारा सेकंद गेली.
'मॅडम, आज तुमचा मान'. कारखानीस बाईंपेक्षा दहा वर्ष लहान असलेल्या साठयांनी हे वाक्य म्हणताच साठयांचे काही 'खास लोक' उगाचच मोठ्यांदा हसले.ठेवणीतली पैठणी नेसून आलेल्या कारखानीस बाई अवघडून खुर्चीवर बसल्या. बाईंना इतकी गर्दी कदाचित अपेक्षित नसावी.
कारखानीस बाईंशी जी आजवर दहा मिनिटाहून जास्त बोलली नसेल त्या एच.आर.च्या सुलक्षणाने मधाळ इंग्रजी भाषेत प्रास्ताविक केलं. इंटरनेटवर मिळणाऱ्या रेडीमेड 'फेअरवेल पोएम्स'मध्ये व्यक्तीच्या नावाच्या जागी तिने 'मृदुला' शब्द पेरताच कारखानीस बाईंसकट सगळेजण 'उर्मिला, उर्मिला' असे ओरडले. सुलक्षणाने मग उरलेली कविता 'मृदुला -उर्मिला' च्या गोंधळात एकदाची पार पाडली. त्यानंतर पुढे आल्या कारखानीस बाईंच्या लंच ग्रुप मधल्या शेजवलकर बाई. प्रसंगानुरूप गाणी म्हणायची यांना कोण हौस. 'निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता' हे गाणं त्यांनी या 'उर्मिलेसाठी' का म्हटलं याचा उलगडा अनेक ज्येष्ठ मंडळींना झाला नाही. 'गीत रामायण' हा कारखानीस बाईंचा weak point असल्यामुळे त्या तल्लीन होऊन ऐकत होत्या, मधे मधे स्वतःही गुणगुणत होत्या. उरलेली तरुण मंडळी मात्र कंबोडिया देशाचं लोकगीत ऐकावं या उत्साहात ते गाणं ऐकत होती.
(एकदाचं) गाणं संपलं.
'Anybody? who wants to say few words about Karkhanis Madam ?' सुलक्षणाने लोकांकडे बघत विचारले.
माणसं स्वतःच्या मृत्यूपेक्षा लोकांसमोर उभं राहून बोलायला घाबरतात. सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले. सुलक्षणाची नजर चुकवून माणसं इकडे तिकडे, वर-खाली पाहू लागले.
मघाशी जागा न मिळाल्यामुळे मागे उभे असलेले लोक आता स्वतःला लकी समजू लागले.
शेवटी 'हो-नाही' करत दोन तीन लोक कारखानीस बाईंविषयी बोलले. ज्या गोष्टींविषयी कारखानीस बाईंची त्यांच्या मागे टिंगल केली जात असे त्याच गोष्टींचं आज कौतुक चालू होतं. कुणी त्यांच्या कामाविषयी बोललं, कुणी मनमिळावू स्वभावाविषयी, तर कुणी त्यांच्या डब्यातल्या आंब्याच्या लोणच्याविषयी!
त्यानंतर भिडे सर उभे राहिले. बाईंविषयी भरभरून बोलले. 'नोकरी चालू असताना हे शब्द कानावर पडले असते तर काम करायचा उत्साह आणखी वाढला असता' वगैरे वाक्य बाईंच्या मनात येत असावी असं बाईंचा चेहरा सांगत होता. भिडे सर बहुदा भाषणाची तयारी करून आले होते. भाषणात ठिकठिकाणी पेरलेल्या कवितांच्या ओळींनी,शायरीने उपस्थितांच्या टाळ्या कमावल्या. भाषण संपताना त्यांनी सुलाक्षणाला
केक आणायची विनंती केली. बाईंनी केक कापला. टाळ्या वाजल्या. सुलक्षणाने पुढे होऊन केकचं क्रीम बाईंच्या गालाला लावलं तसे सगळे हसले. बाई लाजल्या. सुलक्षणाने आता बाईंना चार शब्द बोलायची विनंती केली.
टाळ्यांच्या कडकडाटात बाई 'चार शब्द' बोलण्यासाठी उभ्या राहिल्या.
बाईंनी घसा खाकरला आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली.
'श्री भिडे साहेब आणि ऑफिसमधले माझे सगळे सहकारी मित्र मैत्रिणी.....'
बाईंनी एक छोटा पॉज घेतला आणि शांतता अधिकच हळवी झाली.
बाई पुढे बोलू लागल्या, 'तुमची सगळ्यांची हरकत नसेल तर आज मी मराठीतून बोलणार आहे. तोडकं मोडकं हिंदी-इंग्रजी मधून बोलण्यापेक्षा मला माझ्या भावना मराठीतून व्यक्त करायला आवडतील. अडतीस वर्षांपूर्वी मी या कंपनीत एक ट्रेनी म्हणून जॉईन झाले. तेव्हा ही कंपनी खूप लहान होती. आता सारखे computers, emails, internet वगैरे त्या काळी नव्हते. सगळे व्यवहार कागदावर चालत. तुमच्या देशपांडे सरांना विचारा, आम्ही सगळे मिळून उत्सव- सण उत्साहात साजरे करत होतो. माणसं साधी होती. दिवसभर भांडून चार वाजता चहा प्यायला एकत्र जमायची. हळूहळू कंपनी मोठी होत गेली. कामाच्या वेगाला महत्व आलं. काम करायच्या पद्धतीत बदल होत गेले. बदलाला विरोध करणारी आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं मागे पडू लागली. खूप उशिरा लक्षात आलं की बदलाला विरोध करण्यात जितकी एनर्जी खर्च केली त्याहून आणखी थोडी एनर्जी बदल स्वीकारण्यात खर्च केली असती तर अधिक भलं झालं असतं. पण तसं सहसा होत नसतं. जुने विचार आणि नवीन गोष्टी स्वीकारण्याचा आकस यांना 'अहंकार' नावाचा रबरबॅण्ड घट्ट बांधून ठेवतो. असो. मला आनंद आहे की आम्ही केलेल्या चुका तुम्ही तरुण मुलं करत नाही. तुम्हा तरुण मुलांना बदलाचं आकर्षण आहे आणि वेगाचंही. परंतु या वेगात आपण किती वहावत जायचं याचं भान असू द्या. कुटुंबाला वेळ द्या, आरोग्याकडे लक्ष द्या. या कंपनीने आणि त्यामधील माणसांनी मला आयुष्यातील अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. त्याचं मोल माझ्या रिटायरमेंट फंडापेक्षा खूप पटीने जास्त आहे.' बाईंचा कंठ दाटून आला.
वातावरण हलकं व्हावं या उद्देशाने भिडे साहेबांनी पटकन विचारलं, ' मॅडम, रिटायर झाल्यावर कंटाळा नाही येणार ?'
कारखानीस बाई हसून म्हणाल्या, 'साहेब, बाई कधी रिटायर्ड होते का ?' सगळ्यांच्या हळू हसण्याचा आवाज आला.
बाई म्हणाल्या, 'जोक्स अपार्ट. तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगते. माझ्या वडिलांनी सांगितलेली. कदाचित या गोष्टीत साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. एक राज्य असतं. त्या राज्याचा एक नियम असतो. कुठलाही राजा पाच वर्षाहून जास्त काळ राज्य करू शकत नसतो. त्या राज्याचा आणखी एक विचित्र नियम असतो. पायउतार झालेल्या राजाला एका होडीतून घेऊन जाण्यात येत असतं. नदीच्या त्या काठावर एक घनदाट जंगल असतं. त्यात जंगली प्राणी देखील राहत असतात. अशा जंगलात त्या राजाला सोडून देण्यात येत असतं. एकदा अशाच एक राजाची पाच वर्षाने मुदत संपते. नियमाप्रमाणे तो 'त्या' होडीत बसतो. होडी नदीच्या मध्यभागी येते तरी तो निवृत्त राजा शांत बसून असतो. होडीचा नाविक अस्वस्थ होतो. तो हळूच राजाला म्हणतो, महाराज माफ करा. मी आत्तापर्यंत इतक्या राजांना या होडीतून समोरच्या जंगलात सोडलेलं आहे. प्रत्येक राजा होडीत बसल्यावर किती घाबरलेला असायचा ! तुम्हाला त्या जंगलाची जराही भीती वाटत नाही?' तो निवृत्त राजा शांतपणे म्हणाला, 'मी ज्या दिवशी या राज्याचा पदभार सांभाळला त्या दिवशीच मला हा 'जंगलाचा नियम' सांगण्यात आला होता. पाच वर्षांनी मला या ठिकाणी जाऊन राहायचं आहे यासाठी मी माझ्या मनाची तयारी केली होती. नुसतीच मनाची तयारी नाही तर माझ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत मी त्या जंगलाचे रुपांतर एका सुंदर नगरीत केले आहे. आणि म्हणूनच मला आता तिथे राहायची भीती वाटत नाही उलट आनंद होतो आहे !’.......... माझ्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट माझ्या मनावर इतकी कोरली गेली की त्या दिवसापासून निवृत्तीनंतरच्या त्या भयावह जंगलाचे सुंदर नगरीत रुपांतर करण्यास मी सुरुवात केली. माणसं जोडून, छंद जोपासून ! त्यामुळेच असेल कदाचित, सुदैवाने, उद्यापासून घरी बसून काय करायचं हा प्रश्न मला पडलेला नाही. माझ्या घरच्यांना आणि इतरांना माझा उपयोग होऊ शकेल अशी बरीच कामे माझ्या लिस्टमध्ये आहेत !'.............................
टाळ्यांचा कडकडाट कानात साठवत आणि हातात बुके, भेटवस्तू घेऊन कारखानीस बाई आपल्या टेबलाशी आल्या. आपल्या टेबलावरून-खुर्चीवरून त्यांनी मायेने हात फिरवला. आपल्या 'जागेला' नमस्कार करून त्या निघाल्या. ऑफिसच्या लोकांनी कारखानीस बाईंना घरी सोडण्यासाठी आज 'एसी-टॅक्सी' बुक केली होती. टॅक्सीजवळ सोडायला आलेल्या सगळ्यांचा निरोप घेत बाई टॅक्सीमध्ये बसल्या. टॅक्सी पुढे निघाली तशी बाईंनी मागे वळून आपल्या ऑफिसच्या इमारतीकडे पाहिलं. पण तिथे इमारत नव्हतीच...........
.....कशी असेल ? कारखानीस बाईंच्या डोळ्यात ती अख्खी इमारत बुडून गेली होती !
Excellent
ReplyDeleteGood one Dear.....gostitali gosht chaanach ahe...Amit
ReplyDelete31.03.11
ReplyDeleteSimply great ! it reminds me of authors like
Shri V.P.Kale, Shri Shanna Navre, Shri Pravin Davne, Smt. Shantabai Shelke.
Look forward to a 'Katha Sangraha' by you.
Regards
Ravindra Kale
navin farach chhan,all have to retire sometime ,the kings story is really inspiring.good work !
ReplyDeleteपरत एकदा,तुमचा ह्या गोष्टी मागचा विचार खूप आवडला...सुंदर!
ReplyDeleteMast lihal aahe, Va Pu kalenchi aathawan zali !
ReplyDeleteअतिशय छान
ReplyDeleteexcellent yaar
ReplyDeleteUttam lekhan... Very good work...
ReplyDeleteOne suggestion... Lekhakacha naav jar add kela tar kasa watel??
सुरेख! गोष्टीत गोष्टी आणि तात्पर्यातही तात्पर्य असं लिहिता तुम्ही... खूप आवडलं.
ReplyDelete~ अर्निका
arnika-saakaar.blogspot.com
Speechless .......
ReplyDelete