Thursday, March 17, 2011

काहीतरी नविन - १७ मार्च २०११

Death is not the greatest loss in life.
The greatest loss is what dies inside us while we live.

- Norman Cousins



|| श्री ||

१७ मार्च २०११

प्रिय तात्या,
स.न.वि.वि.
तू रत्नागिरीस सुखरूप पोचल्याचे कळले.
तू इथे असताना सात-आठ दिवस कसे गेले ते कळले सुद्धा नाही. तू घरी नसल्यामुळे तुझी नात (नाव विसरलो ! ) आणि वहिनीचा 'गजरा' अगदीच सुकून गेले असतील !
असो. खूप वर्षांनी भेटलो. निवांत गप्पा झाल्या. कित्ती वर्षांनी जुन्या आठवणी निघाल्या. आपल्या गावाच्या, शाळेच्या, मित्रांच्या (आणि न झालेल्या मैत्रिणींच्या) आठवणी येत राहिल्या आणि गप्पांसाठी आठ दिवसही कमी पडले असे वाटू लागले. तू सुद्धा किती वर्षांनी मुंबईस आलास ! तुला मुंबईचे कौतुक वाटणे सहाजिक आहे. पण मला विचारशील तर,
एक छोटी बरणी झुरळांनी भरून त्यात आणखी झुरळे भरत राहण्याचा 'अट्टाहास' म्हणजे मुंबई !
इथे माणसं उतू जात आहेत पण जिव्हाळा आटलाय. सुखाचा सुकाळ पण समाधानाचा दुष्काळ आहे.
तुमच्या रत्नागिरीच्या पेपरात बातमी आली होती का माहित नाही. मागच्या आठवड्यात मुंबईत एका सुशिक्षित मुलीने आपल्या दोन पिल्लांसह आत्महत्या केली. मुलगी चांगली सीए होती.
मुलांना शाळेचे कपडे घालून लिफ्टने वरच्या मजल्यावर घेऊन गेली. आधी मुलांना खाली टाकून दिलं आणि मग स्वतः... ! मृत्यूचे तांडव तेवढ्यावर थांबले नाही. जपान मध्ये भूकंप-सुनामी येऊन दहा हजाराच्या वर माणसं मेली. आयुष्यात मृत्यू खूप पाहिले, खूप ऐकले. पण आता वय वाढलं आणि मृत्यूचे आघात पचवायची ताकदच हरवून बसलोय बघ. तरी बरं, आपण आता अशा जगात राहतो की आता माणसाला कुठल्या गोष्टीत रेंगाळायला वेळ नाही. म्हणजे असं की, शुक्रवारी जपानमध्ये भूकंप-सुनामीचा प्रकार झाला. टीव्ही वर तिथली दृश्य बघून आम्ही हळहळलो.
सकाळी पेपर वाचून पुन्हा हळहळलो. दुपारी भारत-दक्षिण आफ्रिका मॅच सुरु झाली. जपान-भूकंप-सुनामी...आम्ही सगळं विसरलो. शेवटच्या ओव्हरपर्यंत नखं कुरतडत मॅच पाहिली. भारताचा पराभव झाला. आम्ही भारताच्या संघासाठी हळहळलो.
सगळं काही क्षणिक ! आमचे आनंद, आमची दुःख, आमचे स्वाभिमान, आमचे अपमान - सगळं क्षणिक !
आपले इंग्रजीचे पटवर्धन मास्तर सांगायचे आठवतंय ? 'This too shall pass!' या वाक्याचा अर्थ यापूर्वी इतका नीट समजला नव्हता ! अर्थात यात आमचं तत्वज्ञान कमी, आणि ‘सोय’ जास्त ही गोष्ट वेगळी ! Good is not good when better is available या नियमाप्रमाणे आम्ही आमच्या भावनांची क्रमवारी करतो. माणूस म्हणून ते स्वाभाविक असेलही. पण शहरात राहू लागलं की ते जास्त जाणवतं.
जपान मध्ये सुनामी आली आणि लोक म्हणू लागले - जगबुडी जवळ आली. तात्या मला काय वाटतं सांगू का, निसर्ग अधून-मधून त्याचा खेळ दाखवणारच. आपल्यासाठी तो भूकंप, सुनामी वगैरे. पण निसर्गाच्या अफाट अडगळीत या गोष्टी फारच मामुली आहेत. घरात लहान मुलं मस्ती करू लागली की त्यांचा बाप त्यांच्यावर जसा ओरडतो, तसंच निसर्गाचं आहे. 'रोज सकाळी उठून माझा नाश करताहात. वेळीच सावध व्हा, नाहीतर विनाश अटळ आहे.' हे सांगण्यासाठी निसर्ग अधूनमधून भूकंप-सुनामी वगैरेची भीती घालतो. निसर्गाच्या कालचक्राच्या तुलनेत या सगळ्या नित्याच्या घटना आहेत !
निसर्गाचं हे असं अक्राळ-विक्राळ रूप पाहिलं की आपण माणसं किती कस्पटासमान आहोत याची पुन्हा एकदा जाणीव होते. हीच जाणीव खूप वर्षांपूर्वी हिमालयात गेलो होतो तेव्हा झाली होती. विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात आपल्या पृथ्वीचं अस्तित्व एका बिंदू एवढं देखील नाही. जो क्षण येऊन गेला तो भूतकाळ, पुढचा क्षण येणार की नाही ते माहित नाही.. तेव्हा आत्ताचा 'क्षण' हेच आपलं खरं आयुष्य. तरी या एका 'क्षणात' आपण राग, मत्सर, द्वेष, अहंकार कोंबतो... 'हे माझं-हे तुझं' करतो, खाद्यपदार्थ ‘फ्रीज’ मध्ये ठेवावेत तसे अबोले, भांडणं वर्षानुवर्षे ताजे ठेवतो. जमा केलेली ही सगळी 'मालमत्ता' फक्त एका क्षणासाठी ! आपण कधीतरी मरणार हे माहित असून सुद्धा जो 'अमर' असल्यासारखा जगत राहतो तो माणूस ! जगबुडी येईल नाही तर काय ! पण मला सांग तात्या, आता आणखी काय जगबुडी यायची बाकी आहे ? आपल्या पोटच्या पोरांचा जीव घेऊन एका सुशिक्षित मुलीवर आत्महत्या करायची वेळ येते, ही जगबुडी नाही का ?.......आत्महत्या केलेले ते तीन मृतदेह स्वीकारण्यास त्या दोन बछड्यांचा बाप नकार देतो ही जगबुडी नाही का ?......... 'अप्पा तुम्ही कशाला एवढा विचार करताय, आपल्या घरात झाल्यात का आत्महत्या ?' असं माझ्या घरचे मला सांगतात - ही जगबुडी नाही का ?......
तात्या तू कदाचित हसशील, पण हल्ली मधून मधून जरा spiritual वाचन करत असतो. त्या वाचनात आलेलं काहीबाही धूसरसं आठवत आहे. निसर्गातील इतर कुठलाही सजीव 'आत्महत्या' करत नाही. 'आत्महत्या' हा माणसाचा 'शोध' आहे.
माणूस निसर्गापासून किती दूर गेला आहे याची 'आत्महत्या' ही शेवटची पायरी ! असो.

मी आता रिकामा असतो, म्हणून असेल. पण लहान लहान गोष्टींवर खूप विचार करत बसतो. लहान लहान
गोष्टी मनाला चटकन लागतात. दिवस कसातरी ढकलतो. पण संध्याकाळ खायला उठते. अशाच एका संध्याकाळी तुला पत्र लिहायला बसलो आहे. पत्र लांबले आहे. थोडेसे गंभीर झाले आहे. पण त्याला इलाज नाही. हा सगळा 'संध्याछायेचा' परिणाम !
तीन वर्षांपूर्वी सुलभा गेली. मुलगा, सूनबाई, नातवंडे माझी चांगली काळजी घेतात हे तू पाहिले आहेसच. पण 'म्हातारपण' कळण्यासाठी त्यांना अजून बराच अवकाश आहे.

आता जीव जाण्याची भीती वाटत नाही....... आपला कुणाला उपयोग नाही याची जाणीव हाच मृत्यू !.... रोज रोज येणारा ! म्हणूनच दर दोन-तीन दिवसांनी कुणाकुणाला पत्र लिहित बसतो आणि त्यांच्या उत्तराची वाट पहात बसतो.

तुझ्याही उत्तराची आणि हापूसच्या पेटीची आतुरतेने वाट पाहतो आहे.

वहिनींना नमस्कार आणि लहानांना आशिर्वाद !

तुझा,
अप्पा
-----xxxx----

7 comments:

  1. Namaskar Navin bhau,

    me tujhi khup mothi fan ahe..USA la work madhe busy astana sudha me tujhe lekh adhun madhun vedh kadhun nehmi vachat rahate..because I know I will read something new, manala sparsh karnari lekh ashnarch..and you win always!

    very well defination of Mumbai and yes this too shall pass!

    lahan tondi motha ghas but mhnavese vatate apratim and good job as usual!

    Sincerely,
    Shubhangi

    ReplyDelete
  2. namaskar navin,

    you have made my day today,i am so touched by this article ,cant express the feelings in words.This is the reality of life.
    keep on writing,
    swati

    ReplyDelete
  3. झक्कास...यालाच मृत्यूची हूल की चाहुल म्हणत असावेत.

    ReplyDelete
  4. Ekamagun ek Blog waachale... ani waachu watat rahile....

    One thing boss, u can touch anyone's heart. Really superb writing. I just loved it. I am a BIG fan of yours now.

    Very well done!

    ReplyDelete
  5. kharach chan ahe!!!!!!!
    prashna mansacha piccha kadhich sodt nahit.

    ReplyDelete
  6. Kharach khup chhan lihtat tumhi. agadi manala spurshun janare ani janiv karnare.Matarya manasachi vvyatha kiti changala prakare mandali aahe.Thet manaparyant pohochate. tumche sagalech likhan thet manala jaun bhidate.Eka forwarded kelela mail madhe tumcha ek lekh vachala ani tithun link bhetali ani sagale lekh vachun kadhale ani pratek lekhatun kahitari shikayala bhetale. Tumhi ase ajun lekh lihit ha hi narm vinati aahe.

    ReplyDelete